लोहारा ता पाचोरा–प्रतिनिधी— तालुक्यातील कळमसरा येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्प भूधारक शेतकऱ्याचा शेतातील पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या बकऱ्या चालणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आरोप नागरिकांनी केला आहे.
कळमसरा येथील अल्पभूधारक शेतकरी मधुकर विठ्ठल नेटके वय ५५ हे स्वतःच्या बकऱ्या दिवसभर चारुन घराकडे येत असताना सायंकाळी राजेंद्र बोखारे यांच्या शेतात बकऱ्या घुसत असल्याचे दिसल्याने ते बकऱ्यांना शेतातून बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतात गेल्या पाच ते सात दिवसापासून पडलेल्या महावितरण च्या विजेच्या तारांना त्यांचा स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या ५ ते ७ दिवसांपासून पडलेल्या विजेच्या तारांबाबत महावितरण च्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी कळवून देखील कर्मचाऱ्यांनी आर्थिक लाभापोटी तारा जोडण्यासाठी जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून मयत मधुकर नेटके यांच्या मृत्यूस जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व नेटके यांच्या वारसांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
बकऱ्या पोहचल्या घरी तेव्हा उलगडा झाला—
मधुकर नेटके हे बकऱ्या चारून येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.सायंकाळी ते चारत असलेल्या बकऱ्या बरोबर घरी पोहचल्या मात्र मधुकर नेटके का आले नाही??याबाबत कुटुंबीयांना समजल्याने त्यांनी शोधाशोध केली असता त्यांचा राजेंद्र बोखारे यांच्या शेतात मृत्यू झाला होता. बकऱ्या घरी पोहचल्याने घटना लवकर उघडकीस आली.यावेळी घटनास्थळी हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी यांनी पंचनामा केला.